नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. याबाबत नितीन गडकरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स बनेल ‘रिपोर्ट कार्ड’
नव्या योजनेनुसार प्रत्येक चालकाच्या लायसन्सवर गुण प्रणाली (पॉइंट्स सिस्टिम) लागू केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकाच्या लायसन्सवरील ठराविक गुण कमी केले जातील. जर हे गुण ठराविक मर्यादेपेक्षा खाली गेले, तर चालकाचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. म्हणजेच त्या कालावधीत वाहन चालवण्यास बंदी असेल.
वारंवार चुका केल्यास कायमस्वरूपी रद्द
गंभीर नियमभंग किंवा वारंवार केलेल्या उल्लंघनांवर अधिक कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकरणांत संबंधित व्यक्तीचे लायसन्स कायमचे रद्द करण्याची तरतूदही असणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा परवाना मिळवणे कठीण होऊ शकते.
या उल्लंघनांवर कारवाई ठरणार कठोर
खालील प्रकारच्या चुका वाहनचालकांना महागात पडू शकतात:
वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवणे
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर
चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालवणे
मद्यपान करून वाहन चालवणे