मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे राज्यभरातून चाकरमानी आपल्या गावी जाण्यास धावपळीत आहेत. या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा बसची सोय केली आहे. मंडळाने तब्बल १९८ फेऱ्यांचे नियोजन केले असून त्यापैकी ८३ बस फुल्ल देखील झाल्या आहेत.
होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज लक्षात घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाण्याच्या ओढीने प्रवाशांची संख्या शिगेला पोहोचते. यावर विशेष करत लक्ष केंद्रीत करत २८ फेब्रुवारी, १ ,मार्चला तब्बल १५० फेऱ्या नियोजित केल्या आहेत. त्यापैकी ७० बस फुल्ल झाल्या आहेत. याशिवाय इतर दिवसांसाठी १३ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. एकूण फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंगसाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे कुटुंब, मित्रमंडळी किंवा संस्थात्मक प्रवास करणाऱ्या प्रवाशानांही सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.
लालपरीच्या कमाईत भर
सणासुदीच्या कालावधीत खासगी बसचे तिकीट साधारण २,५०० ते ४ हजार रुपये असते. त्यात एसटीचे तिकीट अधिक परवडणारे ठरणार आहे. त्यामुळे होळीच्या सणात वाढवलेल्या या फेऱ्यांमुळे लालपरीच्या कमाईत चांगलीच भर पडली आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबच गट आरक्षणाचे अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठांना व महिलांना ५० टक्के तिकीट दारात सवलत दिली जात आहे. ग्रुप बुकिंग केल्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतून थेट गावी पोहोचता येणार आहे.