वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात चामड्याच्या पादत्राणांचे प्रशिक्षण सुरू

मुंबई : समाजातील ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित घटकांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकारातून कांदिवली (पूर्व) येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र येथे चर्मकार समाजातील सदस्यांसाठी चामड्याच्या पादत्राणांचे उत्पादन कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. समावेशक विकासाच्या नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित हा उपक्रम समुदायातील सदस्यांना आधुनिक बाजारपेठेच्या गरजांनुसार उत्पादने तयार करण्याची कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणार आहे.


सध्या चर्मकार समाजातील २० सदस्यांना २७ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी आग्रा येथील सेंट्रल फूटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथून देवेंद्र तिवारी आणि मिथुन कुमार सिंग या तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणामध्ये डर्बी बूट, पुरुषांसाठी टाके घालून तयार करण्यात येणाऱ्या चपला तसेच महिलांसाठी चपला अशा तीन प्रकारच्या पादत्राणांच्या निर्मितीचा समावेश आहे.


देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत दर्जेदार पादत्राणांच्या वाढत्या मागणीची दखल घेत, हे प्रशिक्षण संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आले आहे.


उत्तर मुंबईतील चर्मकार समाजातील सदस्यांना संरचित व शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पारंपरिकरित्या चामड्याच्या कामाशी संबंधित असूनही, औपचारिक कौशल्य प्रमाणपत्रे व संस्थात्मक पाठबळाच्या अभावामुळे अनेकांना संधी मिळत नव्हती.


या उपक्रमाबाबत बोलताना पीयूष गोयल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आमचे सरकार आत्मनिर्भर भारत उभारण्यास कटिबद्ध आहे. आधुनिक प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांद्वारे चर्मकार समाजाला सक्षम करणे म्हणजे पारंपरिक कौशल्यांना शाश्वत उद्योजकतेमध्ये रूपांतरित करण्याकडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”


चामडा क्षेत्रासाठीच्या धोरणात्मक पाठबळावर प्रकाश टाकताना त्यांनी पादत्राणांवरील वस्तू व सेवा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचे नमूद केले. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला असून स्पर्धात्मकता वाढली आहे. याचा लाभ लघु उत्पादक व कारागिरांना होत आहे.


रोहिदास चामडा उद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांसारख्या योजना तसेच सूक्ष्म पत वित्त सुविधा, इच्छुक उद्योजकांना आर्थिक सहाय्य आणि नियोजित वाढीच्या संधी उपलब्ध करून देत आहेत.


महत्त्वाचे म्हणजे, उत्तर मुंबईतील चर्मकार समाजातील सदस्यांना प्राधान्य देण्यात आले असले तरी हा प्रशिक्षण कार्यक्रम इतर इच्छुकांसाठीही खुला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कारागीर स्वतःची उत्पादने थेट बाजारात तयार करून विक्री करण्यास तसेच इतर उत्पादक संस्थांना पुरवठा करण्यास सक्षम होतील.


यापूर्वी अशा प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुकांना आग्रा किंवा चेन्नईसारख्या शहरांमध्ये जावे लागत होते. पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली आता ही सुविधा उत्तर मुंबईत, मुंबईतच उपलब्ध झाल्याने अंतर व खर्चाचे अडथळे दूर झाले आहेत.


मंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रशिक्षित कारागिरांनी तयार केलेल्या पादत्राणांच्या खरेदीसाठी विविध उत्पादक संस्थांशी सहकार्याच्या संधीही तपासल्या जात आहेत.


अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात चामड्याच्या पादत्राण प्रशिक्षणाची सुरुवात ही उत्तर मुंबईतील चर्मकार समाजासाठी संधी, सन्मान आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरत आहे.

Comments
Add Comment

BMC News : उपनगरातील महापालिकेच्या ५ रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्या

- खासगी सहभाग तत्वावर रुग्णालयांमध्ये ब्लड बँककरता संस्थांची निवड मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Seven Hills Hospital : सेव्हनहिल्स रुग्णालय पुन्हा खासगी संस्थेचाच ताब्यात

- भाडेकरार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत सादर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने खासगी सहभाग

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व