मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत आहेत. अशातच नागपूर येथून बारावीचे दोन पेपर फुटल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे.
नेमकं घडल काय ?
नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीची हालचाल संशयास्पद आढळली. ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने केंद्रातील परीक्षकांनी तिची झडती घेतली. तपासादरम्यान तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला.
मोबाईल तपासल्यावर एका व्हॉट्सअॅपच्या गटामध्ये प्रश्नपत्रिकेतील मजकूर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शेअर झाल्याचे आढळून आले. यात रसायनशात्र आणि भौतिकशास्त्र या पेपरचा समावेश होता. या गटात एकूण १५ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षकावर गंभीर आरोप
चौकशीत दोन विद्यार्थिनींनी एका खासगी शिकवणीतील शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा आरोप केल्याचे समजते. संबंधित गटातील इतर १३ विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते.
गुन्हा नोंद, तपास सुरू
केंद्रप्रमुखांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून सखोल तपास सुरू आहे. मोबाईलमधील मेसेज , कॉल रेकॉर्ड आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.