२०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटानंतर आता निर्मात्यांनी याच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. ‘द केरळ स्टोरी २’ (The Kerala Story 2) चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात कथेची आणखी एक भीषण आणि गडद बाजू मांडण्यात आली आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनांपासून प्रेरित असल्याचे निर्मात्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. विविध राज्यांमधील हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांचे होणारे शोषण आणि सक्तीने केले जाणारे धर्मांतर, हा या सीक्वेलचा मुख्य विषय आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा पुन्हा एकदा या संवेदनशील विषयात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागावर झालेल्या टीकेनंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे आता या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
'पुढील २५ वर्षांत भारत इस्लामिक स्टेट होईल...';
'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने सोशल मीडियावर वादाला तोंड फोडले आहे. "इन्शाल्लाह, पुढील २५ वर्षांत पूर्ण भारत एक इस्लामिक स्टेट असेल..." या अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक संवादाने या ट्रेलरची सुरुवात होते, ज्यामुळे कथेतील संघर्षाची तीव्रता स्पष्ट होत आहे. ट्रेलरमध्ये राजस्थानमधील एका १६ वर्षीय हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर केल्याचे दाखवण्यात आले असून, तिचे कुटुंब पोलीस ठाण्यात 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसते. कथेचा पुढचा भाग मध्य प्रदेशाकडे वळतो, जिथे एका हिंदू तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली जाते. विश्वासाचा फायदा घेऊन तिचे धर्मांतर करणे आणि त्यानंतर होणारे भीषण शोषण याचे चित्रण ट्रेलरमध्ये करण्यात आले आहे. धर्मांतर, विश्वासघात आणि शोषणाचे हे 'भीषण वास्तव' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा करणाऱ्या या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
चित्रपट कधी होणार रिलीज ?
चर्चेत असलेल्या ‘द केरळ स्टोरी २’ चा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यातील तिसऱ्या कथेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी कथा पुन्हा केरळच्या पार्श्वभूमीवर फिरते, जिथे एका मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला 'लिव्ह-इन रिलेशनशिप'चा प्रस्ताव दिल्यानंतर उद्भवणारा संघर्ष दाखवण्यात आला आहे. जेव्हा तरुणी धर्मांतर करण्यास ठाम नकार देते, तेव्हा तिला कोणत्या भयानक छळाला सामोरे जावे लागते, याची अंगावर काटा आणणारी झलक ट्रेलरमध्ये दिसते. दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच याही भागावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पहिल्या भागावर काही राज्यांनी बंदी घातली होती, तर काहींनी याला 'प्रचारकी' चित्रपट म्हटले होते. आता या दुसऱ्या भागातील 'धर्मांतर आणि शोषणाचे' चित्रण पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे.