वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने आपला निर्णय बदलला असून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. दरवर्षी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरुवातीला गाभारा दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता महाशिवरात्रीला येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पूर्वीप्रमाणेच थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे. भाविकांना केवळ दर्शनच नाही, तर महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून दर्शन घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सुलभ दर्शनासाठी आता मंदिर प्रशासनाकडून विशेष तयारी केली जात आहे.
गाभारा दर्शन बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळत आहे. गर्दीचे नियंत्रण आणि सुरक्षेचे कारण देत यावर्षी महाशिवरात्रीला 'गाभारा दर्शन' बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला होता. आता नव्या नियमानुसार भाविकांना पिंडीला स्पर्श करून किंवा डोके टेकवून दर्शन घेण्याऐवजी केवळ दरवाजातूनच दर्शन घेता येणार होते. ओंकारेश्वर मंदिराच्या धर्तीवर भाविकांना बाहेरूनच जलाभिषेक करण्याची सुविधा देण्यात येणार होती. ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून पहाटे ६ वाजेपर्यंतच दर्शनाची मुभा देण्यात आली होती. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. "दर्शन घेण्यासाठी ४-५ तास लागले तरी चालतील, मात्र आम्हाला गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनच हवे," अशी मागणी भाविकांकडून होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासन आपल्या निर्णयात बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाने मागे घेतला बंदीचा निर्णय
शेकडो वर्षांची 'स्पर्श दर्शनाची' परंपरा खंडित न करता भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरुवातीला गर्दीच्या नियोजनासाठी घातलेली बंदी आता पूर्णपणे उठवण्यात आली आहे. गाभारा दर्शन आणि स्पर्श दर्शनामुळे भाविकांना रांगेत अधिक वेळ लागण्याची शक्यता असली, तरी भाविकांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या लवचिक भूमिकेबद्दल शिवभक्तांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेसाठी आता देशभरातून येणाऱ्या भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून, मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.







