ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत. शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर एक हंगामी व्यवस्था निर्माण करण्यात आली. नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस या व्यवस्थेचे प्रमुख झाले. पण जनतेचा दबाव वाढू लागल्यामुळे निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार बांगलादेशमध्ये आज म्हणजेच गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी मतदान सुरू आहे.
आतापर्यंत ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामी जमात-ए-इस्लामी या माजी मित्रपक्षांच्या नेतृत्वाखालील दोन आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बांगलादेशच्या राजकारणाचे अभ्यासक यंदाच्या निवडणुकीत बीएनपीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. निवडणुकीचा निकाल शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे.
बांगलादेशमध्ये १२ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त पात्र मतदार आहेत. पण मतदानाचा आतापर्यंतचा उत्साह बघता सार्वत्रिक निवडणुकीतले एकूण मतदान हे ५० टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान होणार आहे. भारतीय वेळेनुसार बांगलादेशमध्ये संध्याकाळी पाच वाजता मतदानाची मुदत संपणार आहे.
यंदा सहा लाख ४८ हजार जणांनी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टपालाद्वारे मतदान केले आहे. बांगलादेशमध्ये १३ व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.