ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत. शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात एक हंगामी व्यवस्था निर्माण झाली. पण जनतेचा दबाव वाढू लागल्यामुळे निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार बांगलादेशमध्ये आज म्हणजेच गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी मतदान झाले.
बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान झाले. मतदानाची नेमकी आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. पण मतदान संपताच नियोजनानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवार १३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत बांगलादेशमध्ये कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.
मतदानादरम्यान ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामी जमात-ए-इस्लामी या माजी मित्रपक्षांच्या नेतृत्वाखालील दोन आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बांगलादेशच्या राजकारणाचे अभ्यासक यंदाच्या निवडणुकीत बीएनपीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
बांगलादेशमध्ये १२ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त पात्र मतदार आहेत. पण मतदानाचा आतापर्यंतचा उत्साह बघता सार्वत्रिक निवडणुकीतले एकूण मतदान हे ५० टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचार या वेळेत मतदान झाले. भारतीय वेळेनुसार बांगलादेशमध्ये संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली आहे. यंदा सहा लाख ४८ हजार जणांनी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टपालाद्वारे मतदान केले आहे. बांगलादेशमध्ये १३ व्या संसदीय निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
ढाका येथे असलेल्या बांगलादेशच्या संसदेत एकूण ३५० जागा आहेत. यापैकी ५० महिलांसाठी राखीव असून त्यावर नामनिर्देशीत पद्धतीने विजयी पक्ष त्यांचे प्रतिनिधी पाठवतील. यासाठीचा प्रत्येक पक्षाचा कोटा त्यांना निवडणुकीत किती जागा मिळतात यावर अवलंबून असेल. संसदेतील ३०० जागांसाठी मतदान होणार होते. पण एका उमेदवाराचे निधन झाल्यामुळे २९९ जागांसाठीच मतदान झाले. एका जागेसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
बांगलादेशच्या संसदेतील २९९ जागांसाठी १९८१ उमेदवार रिंगणात होते. पात्र मतदारांनी या उमेदवारांमधून त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडण्यासाठी मतदान केले तसेच मुहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकारने सादर केलेल्या ८४ कलमी सुधारणा कार्यक्रमासाठीही मतदान केले. निकाल शुक्रवार १३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत येणार आहेत.