मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा आणि सुनेत्रा पवारांचा आगामी दिल्ली दौरा याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असल्याचे चित्र आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या बैठकीत खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या विलीनीकरणाबाबत भाजपची नेमकी भूमिका काय असेल, यावर या दौऱ्यात चर्चा झाली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही स्थानिक नेत्यांनी दावा केला होता की लवकरच विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होऊ शकते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, केवळ 'निवडणूक समन्वय' साधण्याबाबत अजितदादांची भूमिका होती, असे स्पष्ट केले आहे. परंतु, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव पाहता विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा
नव्याने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार सुद्धा येत्या १२-१३ फेब्रुवारीला दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीवर आणि राज्यसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.