अंडर १९ विश्व चषक २०२६ भारतीय संघाने जिंकला. या चषकात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. आपल्या खेळीने त्याने क्रिकेट प्रेमींची मनं जिंकली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने १७५ धावा करून भारताला सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यास मदत केली. या स्पर्धेत तो सर्वोत्तम खेळाडू ठरला. मात्र आता तो पुढचा अंडर १९ वर्ल्ड कप खेळू शकणार नाही आहे.
चौदा वर्षांचा वैभव सूर्यवंशी दोन वर्षांत १७ वर्षांचा होईल. पुढील १९ वर्षांखालील विश्वचषक २०२८ मध्ये होणार आहे. मात्र बीसीसीआयच्या नियमांमुळे, वैभव त्या विश्वचषकात खेळू शकणार नाही. २०१६ मध्ये, बीसीसीआयने एक नियम लागू केला ज्यामध्ये कोणताही खेळाडू १९ वर्षांखालील विश्वचषकात एकापेक्षा जास्त वेळा खेळू शकत नाही. या नियमाच्या वेळी, राहुल द्रविड भारतीय १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते. अधिकाधिक तरुण खेळाडूंना ज्युनियर स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळावा यासाठी बीसीसीआयने हा नियम केला आहे.
वैभव सूर्यवंशीचा मोठा सन्मान:
विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात वैभवने केलेल्या १७५ धावांच्या खेळीमुळे भारताला इंग्लंडसमोर ४१२ धावांचं आव्हान ठेवता आलं. त्यानंतर भारताने इंग्लंडला ३११ रन्सवर ऑलआऊट करत सामन्यासह वर्ल्ड कप जिंकला. वैभव सूर्यवंशीला त्याने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर आता वैभव सूर्यवंशीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसी कडून वैभवाची थेट मुख्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आयसीसीनेच याबाबतची माहिती दिली आहे.