राणेंचा बालेकिल्ला अभेद्य! सिंधुदुर्गच्या जनतेने मशाल विझवली

सुहास शेलार


कोकणच्या लाल मातीतील राजकारणाचे संदर्भ जरी बदलत असले, तरी येथील रांगडा स्वभाव आणि नेतृत्वावरील निष्ठा आजही कायम आहे, याची प्रचिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाने आली. ५० पैकी तब्बल ४१ जागांवर विजय मिळवत भाजप-महायुतीने विरोधकांचा सपशेल पराभव केला असून, ‘राणेंचा बालेकिल्ला’ आजही अभेद्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकारणात लाटा येतात-जातात; मात्र जनतेच्या मनात ज्यांची मुळे खोलवर रुजलेली असतात, त्यांना कोणतीही राजकीय वादळे डळमळीत करू शकत नाहीत, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केले आहे.


हा निकाल म्हणजे खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दशकानुदशकांच्या तपस्येची, सातत्यपूर्ण जनसंपर्काची आणि विकासाभिमुख राजकारणाची पुनःपुष्टी आहे. कोकणच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या दूरदृष्टीपूर्ण आराखड्याला जनतेने नेहमीच भक्कम पाठिंबा दिला आहे. या विजयाचे प्रमुख शिल्पकार म्हणून मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचा उल्लेख करावा लागेल. या दोन्ही युवा नेत्यांनी जिल्हाभरात उभी केलेली आक्रमक, शिस्तबद्ध आणि परिणामकारक संघटनात्मक बांधणी पाहता विरोधकांची सारी गणिते कोलमडून पडली.


कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघात मिळालेले निर्विवाद वर्चस्व हे विकासाच्या राजकारणाचे ठळक यश मानावे लागेल. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर राणे कुटुंबाने दिलेला सातत्यपूर्ण भर जनतेला भावलेला आहे. 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे राणेंनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला, त्याचेच प्रतिबिंब आजच्या निकालात उमटले आहे. विरोधासाठी विरोध करणाऱ्यांना बाजूला सारत जनतेने विकासालाच कौल दिला आहे.


दुसरीकडे, स्वतःला कोकणचा कैवारी म्हणवून घेणाऱ्या ‘उबाठा’ गटाची या निवडणुकीतील दयनीय अवस्था चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या तीन जागांवर त्यांना समाधान मानावे लागले असून, सात तालुक्यांपैकी अनेक ठिकाणी खातेही उघडता आलेले नाही. त्यांची ‘मशाल’ विझत चालल्याची ही स्पष्ट चिन्हे आहेत. केवळ भावनिक साद घालून राजकारण करता येत नाही; जमिनीवर उतरून सातत्याने काम करावे लागते, हा धडा सिंधुदुर्गच्या जनतेने त्यांना दिला आहे. संघटनेसाठी आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे फळ उबाठा गटाला आज भोगावे लागत आहे.


राजकारणात टीका-टिप्पणी आणि आव्हाने येतच असतात; मात्र जो नेता जनतेच्या सुख-दुःखात खंबीरपणे सहभागी होतो, जनता त्याच्याच पाठीशी उभी राहते, हे सिंधुदुर्गने दाखवून दिले आहे. महायुतीचा हा विजय जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला अधिक गती देणारा ठरेल, यात शंका नाही. या निकालाने हेही सिद्ध केले, की राणेंचा बालेकिल्ला कालही मजबूत होता, आजही अभेद्य आहे आणि भविष्यातही विकासाच्या बळावर तो तसाच दिमाखात उभा राहील! या विजयासाठी भाजप-शिवसेनेच्या महायुतीला शुभेच्छा.

Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe Patil : “जरांगेंचं समाधान होत असेल तर राजीनाम्यास तयार”; विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं असून, मराठा आंदोलक नेते मनोज

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील

IPL 2026 : प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा!

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब आययपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील ६१ वा सामना