श्रीलंका: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना तीन विकेट्सने जिंकला असला तरी, पण नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा अपयशी ठरला. कर्णधार सलमान अली आगाचा खेळ देखील फारसा चालला नसल्याने पहिल्याच सामन्यात पाकचा रडतखडत विजय झाला आहे.
बाबर आझम पुन्हा फ्लॉप...
टी २० विश्वचषकाच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात, पाकिस्तानचा फलंदाज स्टार बाबर आझमने ८३.३३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, त्याने १८ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. तसेच उस्मान खान शून्यावर बाद झाला, तर सॅमही चुकीचा फटका मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. फलंदाजीत साहिबजादा फरहानने पाकिस्तानकडून सर्वाधिक ४७ धावांची झुंज दिली, तर सॅम अयूबने २४ धावा केल्या. मात्र पाकिस्तानची मधली फळी पूर्णपणे कोलमडली. एकवेळ पाकिस्तानचा स्कोअर ९८/३ असा असताना तो झपाट्याने १००/५ झाला आणि सामना नेदरलँड्सच्या बाजूने झुकला. शादाब खान (८), मोहम्मद नवाज (६) आणि आघा सलमान (१२) देखील अपयशी ठरले.