मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी 'गमोसा' देऊन स्वागत केले.
पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील १० वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची निवड झाली. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव झाल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा २०२६' साठी देशभरातील तब्बल ४.५ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेतून देशभरातून केवळ ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथील १० वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेची झालेली निवड आपल्या प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून टाकणारी आहे.
ग्रामीण भागातील शाळेत शिकणारा आपला मुलगा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार... ही संधी केवळ प्रणवसाठीच विशेष नाही, तर यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळणार आहे. प्रणवसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
प्रणवचे व त्याला घडवणाऱ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि त्याच्या विद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!