शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १८ कामगारांचा मृत्यू झाला असून, अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस महासंचालक आई नोंगरंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना घडली तेव्हा खाणीत नेमके किती कामगार कार्यरत होते, याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कामगारांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. सध्या स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. मेघालयातील अवैध खाणकामाचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर उघडपणे कथित स्वरुपात काळी जादू ...
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्समध्ये झालेल्या भीषण कोळसा खाण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) सोशल मीडियाद्वारे मोदींचा संदेश शेअर केला असून, या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, या घटनेतील जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी'तून (PMNRF) २ लाख रुपये, तर गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी माहिती दिली की, एका गंभीर जखमी व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारांसाठी राजधानी शिलाँग येथे हलवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, ती खाण बेकायदेशीरपणे चालवली जात असल्याची प्राथमिक शक्यता पोलीस अधीक्षकांनी वर्तवली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (NGT) २०१४ मध्येच मेघालयातील 'रेट होल' कोळसा खाणींवर कायदेशीर बंदी घातली होती, मात्र तरीही हा व्यवहार सुरू होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सखोल चौकशी सुरू आहे.