केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी वाढवण बंदरासाठी थेट जलद रेल्वे जोडणीची घोषणा केली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी २ फेब्रुवारी रेल्वे प्रकल्पांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्पांचे काम सुरू असल्याचे सांगून आता लवकरच मुंबई-पुणे प्रवास फक्त ४८ मिनिटांमध्ये करता येईल असे सांगितले.
काय म्हणाले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ?
राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात दुहेरीकरण, चौपदरीकरण अशा मार्गांचा समावेश आहे. राज्यातील दुसरी बुलेट ट्रेन मुंबई-पुणे-हैदराबाद मार्गावर धावणार आहे. याचबरोबर वाढवण बंदराला नव्या समर्पित मालवाहतुकीची जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
१५ डब्यांच्या अधिक लोकल फेऱ्या:
रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की; कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणात कवच प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया रेल्वे मंत्रालयाने सुरू केली आहे. तसेच मुंबई उपनगरी रेल्वेवरील गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या अधिक लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लोकलची प्रवासी संख्या लक्षात घेता मेट्रोहून अधिक उन्नत आराखड्यात २३८ वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे ४८ मिनिटांत :
अर्थसंकल्पात चार हजार किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन विस्ताराचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला. मुंबई-पुणे-हैदराबादसह सात मार्गांचा यात समावेश करण्यात आला आहे. मुंबई-हैदराबाद मार्गावरून राज्यातील दुसरी बुलेट ट्रेन धावणार आहे. यामुळे मुंबई-पुणे अंतर केवळ ४८ मिनिटांत तर पुणे-हैदराबाद हे अंतर एक तास ५५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. याचा थेट फायदा मुंबई-पुणेदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होईल. बुलेट ट्रेनमुळे दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अंतर कमी होईल. त्याचबरोबर बुलेट मार्गालगत कंपन्या, शहरीकरण आणि आयटी हब उभारणीमुळे रोजगारातही वाढ होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.