भारताने मालिका विजयावर उमटवला शिक्का
तिरुवनंतपुरम : टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली होती. अभिषेकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती.
मात्र सॅमसन तिसऱ्याच षटकात ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेकही चांगल्या सुरुवातीनंतर ५ व्या षटकात बाद झाला. त्याने १६ चेंडूंतच ३० धावांची खेळी केली. दोघांनाही लॉकी फर्ग्युसनने बाद केले. या दोन विकेट्सनंतर मात्र इशान किशनचे वादळ न्यूझीलंडवर घोंगावले. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. इशान किशन अत्यंत आक्रमक खेळत होता. त्याने २८ चेंडूतच अर्धशतक केले. तसेच १२ व्या षटकांत इश सोधीविरुद्ध २९ धावाही चोपल्या. त्याच्यासोबत सूर्यकुमारही चांगला खेळत होता. त्यानेही २६ चेंडूंत अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर तो १५ व्या षटकात बाद झाला. त्याला मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टीम सिफर्टने यष्टीचीत केले. सूर्यकुमारने ३० चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ६३ धावा केल्या. पण असे असले तरी इशान मात्र त्याच्या लयीत खेळत होता. त्याने ४२ चेंडूंत त्याचे शतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांने आपल्या ४ षटकांमध्ये पाच बळी घेतले.
न्यूझीलंडचा डाव २२५ धावांवर आटोपला
सलामीवीर टीम सेफर्ट स्वस्तात बाद झाला. सेफर्टला अवघ्या ५ धावांवर अर्शदीप सिंगने माघारी धाडले. त्यानंतर फिन अॅलनने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. अॅलनने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केवळ २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. अॅलन शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र अक्षर पटेलने त्याची झंझावाती खेळी थांबवली. अॅलनने ६ षटकार आणि ८ चौकारांसह ३० चेंडूंत ८० धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर कोणी मोठी कामगिरी केली नाही आणि संपूर्ण न्यूझीलंडचा संघ २२५ धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने ४६ धावांनी हा सामना जिंकून मालिकेचा शेवट दिमाखात केला.