मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्वाची सूत्रे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती दिली. विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. शपथविधी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ‘अजितदादा अमर रहे’ आणि ‘महाराष्ट्राचा एकच वादा, अजितदादा’ अशा घोषणा देत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील पक्षाचे सर्व ४८ आमदार उपस्थित होते. सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर शनिवारी दुपारी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व आमदारांनी या प्रस्तावाला समर्थन दिले.
सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील अशा एकूण ४८ आमदारांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत दोन ठराव संमत करण्यात आले असून, पहिल्या ठरावानुसार त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार पक्षनेता म्हणून निवड करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही ठरावांना एकमताने संमती मिळाल्याने सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे सर्वाधिकार आले आहेत.
गटनेतेपदी निवडीची अधिकृत पत्रे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधिमंडळ सचिवालयाकडे सादर केली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला असून, तो उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.