रायबरेली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींसोबत सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांचेही नाव आहे. सरकारी जमिनीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
पाजा फाउंडेशन या संस्थेने हा खटला दाखल केला आहे. सरकारी जमीन व तलावाच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने इमारत बांधण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका शाळेसाठी मान्यता घेतल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गांधी कुटुंबाने मदत केल्याचे याचिकेत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने पोलिसांकडे सविस्तर अहवाल मागवला आहे.
या प्रकरणात गांधी कुटुंबासोबत जिल्हाधिकाऱ्यांसह ४५ लोकांनी मिळून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. आता ९ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्व गांधी परिवार अडचणीत सापडला आहे.