गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत अंतिम दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. तिघांनीही एकत्र येत अजित पवारांच्या पार्थिवास अभिवादन केले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी जड अंतःकरणाने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचा काळजाचा ठोका चुकला आणि संपूर्ण विद्या प्रतिष्ठान परिसर शोकसागरात बुडाला.
मुलांचा शोक आणि जनसागराची गर्दी :
पार्थ आणि जय पवार आपल्या पित्याला निरोप देताना अत्यंत भावूक झाले होते. वडिलांचा वारसा आणि त्यांची शिस्त सोबत घेऊन चालणाऱ्या या दोन्ही पुत्रांना सावरताना जवळच्या नातेवाईकांनाही कठीण जात होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. बारामतीकरांनी आपल्या या 'लोकनेत्या'ला निरोप देण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती, ज्याचे रूपांतर दुपारी एका अलोट जनसागरात झाले.
"परत या, परत या ... अजितदादा परत या" :
अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला. यावेळी कार्यकर्त्यांकडून "परत या, परत या ... अजितदादा परत या", "थांबा! आमच्या दादांना नेऊ नका, आम्ही पाया पडतो" अशा शब्दांमध्ये आक्रोश सुरू आहे. संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली आहे. सर्वांना आपले अश्रू थांबवून ठेवणं कठीण झालं आहे.