संत नामदेव

देव दाखवी ऐसा नाही गुरु
देव दाखवी ऐसा नाही गुरु।
जेथे जाय तेथे दगड शेंदरू॥
देव दगडाचा बोलेल कैचा।
कोण काळी त्यास फुटेल वाचा॥
देव देव करिता शिणले माझे मन।
जेथे जाय तेथे पूजा पाषाण॥
नामा तोचि देव हृदयी पाहे।
नामा, केशवाचे न सोडी पाये॥


- डॉ. देवीदास पोटे


संत नामदेव हे विठ्ठलाचे प्रेमभंडारी म्हणजे लडिवाळ भक्त. ‘नाम’ हाच त्यांचा देव होता. आयुष्यभर ते हरिनामाच्या रंगात रंगून गेले होते. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ अशी प्रतिज्ञा करुन त्यांनी भारतभ्रमण केले आणि भागवत धर्माची धर्मपताका उत्तरेपर्यंत नेली. ‘नामे नारायण नाही भेद’ हे विचारांचे सूत्र घेऊन त्यांनी माणसाच्या जीवनाला आनंदाचे परिणाम दिले. विविध ठिकाणी विखुरलेल्या आणि मनाने विस्कटलेल्या समाजाला त्यांनी भक्तिमार्गाचे तत्त्व प्रतिपादन केले. माणसा माणसातले ऐक्य, बंधूभाव जोपासत त्यांनी राष्ट्रीय एकताही साध्य केली.


या अभंगात ते म्हणतात, ‘‘आपल्याला देव दाखवणारा गुरू मिळणार नाही. जिकडे जाऊ तिकडे शेंदूर फासलेला दगड आढळेल. या दगडाचा देव कसा काय बोलणार? त्याला कधी वाचा फुटणे शक्य आहे का? देवाचा शोध घेता घेता मन पार थकून गेले. जिकडे पाहावे तिकडे पाषाणाची पूजा चालते. मी देवाला माझ्या हृदयात पाहातो आणि केशवाच्या चरणावर मस्तक ठेवतो.’’
संत नामदेवांनी नामाच्या भक्तीने देवालाही प्रेमाचा लळा लावला. नामदेव म्हणजे भक्तीची सजीव मूर्ती.


आजच्या वर्तमान काळातही लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. ते दगडाच्या देवावर विसंबून राहतात. उपास करतात. नवस बोलतात. लोकांना योग्य-अयोग्य समजेनासे झाले आहे. मग ते कुठल्यातरी बाबा, स्वामी, महाराज यांच्या नादी लागतात नि अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. देव ही दाखवण्याची वस्तू नाही. देव ज्याने त्याने प्राप्त करायचा असतो. खरा गुरू शिष्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. देवाचे खरे स्वरुप ओळखा असे संतांनी आपल्याला सांगितले आहे. भक्तीची वाट चालताना सगुणाकडून निर्गुणाकडे गेले पाहिजे. देवाला इकडे तिकडे न शोधता आपल्या अंतरंगातील देव शोधला पाहिजे. म्हणूनच देव हृदयी पाहे, केशवाचे न सोडी पाये असा स्पष्ट संदेश संत नामदेवांनी दिला आहे.

Comments
Add Comment

शीख गुरुपरंपरेचा देदीप्यमान वारसा

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर यांना संपूर्ण भारतात “हिंद द चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते.

संत सोयराबाई

अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला | रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया | पाहता पंढरीचा राया नाही भेदाचे ते काम |

वसंत पंचमी २०२६ : ज्ञान, कला आणि नव्या सुरुवातीचा शुभ दिवस; जाणून घ्या सरस्वती पूजनाची परंपरा आणि महत्त्व

मुंबई : माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरी होणारी वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील विशेष मानाचा दिवस मानला जातो.

सुप्रभात

कथनी योथी जगत में, कथनी योथी जगत में, करनी उत्तम सार । कह कबीर करनी सबल, उतरै भौ - जल पार ।। बोलणे आणि कृती करणे या

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात ७ दिवसीय माघी गणेशोत्स..

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आज आपल्याला प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. आज माघी

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती...माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघी गणपती जयंती हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म झाला आहे.