अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला | रंगी रंगला श्रीरंग
मी तू पण गेले वाया | पाहता पंढरीचा राया
नाही भेदाचे ते काम | पळोनी गेले क्रोध काम
देही असूनी तू विदेही | सधा समाधिस्त पाही
पाहते पाहणे गेले दूरी | म्हणे चोख्याची महारी
- डॉ. देवीदास पोटे
संत सोयराबाई ही संत चोखामेळा यांची पत्नी. चोखामेळा यांच्या सहवासात तिच्या मनात विठ्ठलाच्या भक्तीचे आत्मरंग उमलले होते. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा इत्यादी संत कवयित्रींप्रमाणे सोयराबाईलाही विठ्ठलाचे दर्शन झाले आणि त्या मनोहर दर्शनाने तिची चित्तवृत्ती मोहरून गेली.
सोयराबाईचा हा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगात ती म्हणते,
"आता माझा आणि श्रीरंगाच्या अंतरीचा रंग एकच झाला आहे. माझा भक्तिरंग आणि त्याच्या कृपेचा रंग एकमेकांत मिसळून गेले आहेत. श्रीरंगही या उत्कट रंगोत्सवात रंगून गेला आहे. पंढरीचा राया दृष्टीस पडला आणि ‘मी-तू’पणाची भावना गळून पडली. क्राम, क्रोध आणि देहाची जाणीवही हरवली. विठ्ठलाला पाहिले आणि त्याचाशी एकरूप झाले. तो आणि मी असे वेगळेपण उरले नाही. मग ‘पाहणे’ ही क्रियाही दूर गेली."
अशिक्षित असूनही सोयराबाईच्या काव्यविषयक जाणीवा प्रगल्भ होत्या याचा प्रत्यय या अभंगाद्वारा येतो. विठ्ठलासी एकरूप झाल्यावर वेगळेपणाचे अस्तित्व संपले. ‘‘देही असून तू विदेही’’ या ओळीतून हा अनुभव मांडला आहे. मी-तू हे द्वेत लोप पावले. मग एकमेकांना ‘पाहणे' आपोआप दूर गेले म्हणजे लय पावले. एकरूपत्व झाल्यावर स्वतः स्वतःला कसे पाहणार? ‘पाहणे गेले दूरी’ या शब्दांतून आपल्याला अभिजात काव्यात्मकतेचा प्रत्यय येतो. यातून सोयराबाईच्या प्रगल्भतेचा आविष्कार आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.
सोयराबाई स्वतःचा उल्लेख 'चोख्याची महारी' असा करते. यातून पत्नीनिष्ठा आणि विठ्ठलाबाबतचा नितांत भक्तिभाव प्रतीत होतो. तिथा अभंगरचनेत सहजता आणि नादमयता या काव्यगुणांचा आविष्कार झाला आहे. "रंगी रंगला श्रीरंग’’ या अनुप्रासात्मक शब्द योजनेमुळे काव्याला, नादमयता आणि तरलता आली आहे.