Tuesday, January 20, 2026

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी

मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा समावेश होणार की नाही हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमधील वाद अजून मिटलेला नाही. दोघांमधील तणाव सध्या वाढला असून बांगलादेश सतत त्यांचे सामने हे श्रीलंका किंवा पाकिस्तानला हलवण्याची मागणी करत आहे. मात्र आयसीसीने बांगलादेशलाच थेट ‘अल्टीमेटम’ दिला आहे. बांगलादेशला त्यांचे सामने भारतातच खेळावे लागतील, असे ठणकावून सांगितले आहे.

आयसीसीने बांगलादेशला २१ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. आयसीसीने स्पष्ट केले आहे की जर बांगलादेश भारतात येण्यास नकार देत असेल, तर त्यांना त्यांच्या जागी दुसऱ्या संघाला समाविष्ट करण्यात येईल. म्हणजे तर बांगलादेशची टी -२० वर्ल्ड कपमधून पत्ता कट झाला तर आता त्याच्या जागी कोणता संघ खेळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

...अन्यथा इतर संघाला मिळणार संधी

जर बांगलादेशने आयसीसीचे म्हणणे ऐकले नाही, तर त्याच्या जागी स्कॉटलँडचा संघ टी-२० वर्ल्ड कप खेळणार आहे. आयसीसी टी- २० रँकिंगमध्ये बांगलादेश सध्या ९ व्या स्थानावर आहे. त्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंड, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या देशांचे नाव आहे. मात्र हे सर्व संघ वर्ल्ड कपचा भाग आहेत. त्यानंतर १४ व्या क्रमांकावर स्कॉटलँड आहे. त्यामुळे जर बांगलादेश टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडला, तर आयसीसी स्कॉटलँडला संधी देण्याची संधी आहे.

आयसीसीचा पारा चढला

इएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार टी-२० वर्ल्डकप सुरू होण्यास फक्त तीन आठवडे राहिले आहेत. अजूनही बांगलादेशचे नाटक संपत नाही. त्यामुळे आयसीसीचे धैर्य संपुष्टात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी कोलकात्यात इडन गार्डन्सवर बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडीज हा सामना होणार आहे. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी बांगलादेश इटलीविरुद्ध खेळणार आहे, तर १४ फेब्रुवारीला इंग्लंड, १७ फेब्रुवारीला नेपाळविरुद्ध सामना खेळणार आहे.

वेळापत्रक बदलणे शक्य नाही : आयसीसीच्या मतानुसार आता एवढ्या कमी वेळेत वेळापत्रक बदलणे, लॉजेस्टिक, ब्रॉडकास्टिंग आणि तिकीटासंदर्भात बदल करणे शक्य नाही. दरम्यान बांगलादेशकडून आयसीसीला काही प्रस्ताव देण्यात आले होते. ते सर्व प्रस्ताव आयसीसीने फेटाळून लावले आहेत. बीसीबीने बांगलादेश आणि आयर्लंड यांचे ग्रुप आपापसात बदलले जावे. त्यामुळे बांगलादेशचे सर्व सामना श्रीलंकेत खेळवता येईल असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र क्रिकेट आयर्लंडने स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या सामन्याबाबत त्यांना पक्की गॅरेंटी मिळाली आहे त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ग्रुप बदलण्याने ब्रॉडकास्टर, तिकीट पार्टनर्स आणि इतर संघासोबत मोठा वाद निर्माण होऊ शकतो.

Comments
Add Comment