ठाण्याचा गड महायुतीने राखला

सलग दुसऱ्यांदा एकहाती वर्चस्व; सत्ता एकनाथ शिंदेंचीच


ठाणे :ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेला ‘शंभर पार’चा नारा यशस्वी ठरला असून, एकूण १०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या यशातही स्पष्टपणे वर्चस्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच राहिले आहे. शिवसेना (शिंदे गट) ने ७० हून अधिक जागा जिंकत महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे ठाण्याचे ‘ठाणेदार’ पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी १ हजार १०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९९ अर्ज बाद झाले, तर उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत २६९ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी शिवसेना (शिंदे गट) चे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले.


महायुतीत शिवसेना (शिंदे गट) ने ८७ जागा, भाजपने ४० जागा तर मित्रपक्षांना ४ जागा देण्यात आल्या होत्या. निकालानुसार शिवसेनेचे ७० हून अधिक उमेदवार विजयी झाले असून, भाजपचे २७ ते २८ नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी बहुमताचा ६७ चा आकडा शिंदे गटाने सहज पार केल्याने पालिकेतील सत्ता पूर्णतः त्यांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे महापौरपदही शिवसेना (शिंदे गट) कडेच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


निकराची लढत; शिंदेंचे पॅनल विजयी:


मानपाडा–आझादनगर येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेना (शिंदे गट) च्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह विक्रांत वायचळ, लहू पाटील आणि पदमा भगत हे चारही उमेदवार विजयी झाले. उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवक भुषण भोईर आणि मधुकर पावशे यांनी जोरदार आव्हान दिले होते. मतदानानंतर दोन्ही समर्थकांमध्ये वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसे आणि उबाठा गटाचे उमेदवारही रिंगणात असल्याने ही लढत अधिक चुरशीची ठरली. अखेर शिंदे गटाच्या पॅनलने येथे बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले. ठाणे महापालिकेच्या या निकालामुळे सलग दुसऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे शहरावरचे राजकीय नियंत्रण अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


मनसे-काँग्रेस शून्य; दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष हरले:


काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का बसला असून, दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांचाही पराभव झाला. या दोन्ही पक्षांचे अक्षरशः धूळधाण झाली आहे. शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वर्चस्व कायम राखले आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी उबाठा, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याकडून महाविकास आघाडीची रणनिती आखण्यात आली होती. मनसेने महाविकास आघाडीतून २८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही मनसेला ठाण्यात यश मिळाले नाही.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे