भिवंडी : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ३० जागांवर विजय मिळवत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. भाजपनेही चांगली कामगिरी करत २२ जागा जिंकल्या असल्या तरी, पक्षाला बहुमत मिळवता आलेले नाही. या निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. अंतिम निकालात भाजपला सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ मिळालेले नाही. मात्र मागील निवडणुकांच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) : १२ जागा, शिवसेना (शिंदे गट) : १२ जागा, कोर्णाक आघाडी : ४ जागा, भिवंडी विकास आघाडी : ३ जागा, अपक्ष : १ जागा. भिवंडी महापालिकेत एकूण ९० जागा असून बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. सध्याच्या समीकरणानुसार काँग्रेसप्रणित आघाडीची सत्ता स्थापन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, येत्या काही दिवसांत सत्तास्थापनेबाबत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. भिवंडीच्या निकालामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.






