मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहिले, तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करीत, स्वबळावर तब्बल १६ ठिकाणी बाजी मारली. तर, महायुतीत त्यांनी २५ पालिका जिंकल्या. उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत चांगली कामगिरी केली. मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये मात्र त्यांचा स्ट्राईक रेट काहीसा घसरला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकाही महापालिकेत चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हे नेते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याची चर्चा दिवसभर रंगली.
परंतु, एकनाथ शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहिल्याचे त्यांच्या सहकारी मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिका निवडणुकीतील सलग प्रचार दौऱ्यांचा शिंदे यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरातील प्रचंड धावपळीमुळे त्यांची तब्येत बिघडली असून, डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व नियोजित कार्यक्रम राखीव ठेवले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती. तर, बारामती येथे कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेटला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये थांबणार
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ९० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी २९ जागांवर त्यांना विजय मिळाला. निकालानंतर सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष रणनीती आखल्याची चर्चा आहे. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सत्तास्थापनेपर्यंत वांद्रे येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.