Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल धक्कादायक ठरताना दिसत आहे. मतमोजणीच्या ताज्या कलानुसार, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या युतीला मुंबईकरांनी नाकारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल केली असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे केवळ काही मोजक्याच जागांवर अडकली आहे. विशेष म्हणजे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करूनही राज ठाकरे यांना मुंबईत आपली छाप पाडता आलेली नाही.



महायुतीची निर्णायक मुसंडी


भारतीय जनता पक्षाने मोठी झेप घेतली असून, 'मिशन मुंबई' फत्ते करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. २२७ जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भाजपने तब्बल ८८ जागांवर आघाडी घेत मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही २८ जागांवर आघाडी मिळवत महायुतीची ताकद वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाने दिलेले कडवे आव्हान मोडीत काढत, मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 'डबल इंजिन' सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.



मनसेला मोठा फटका


मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेचे या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले आहे. राज ठाकरे यांनी यंदा उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करत मुंबईत 'मराठी कार्ड' खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरुवातीच्या निकालानुसार मनसेला केवळ ५ जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं दिसत आहे. २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते, यंदा युती करूनही ही संख्या वाढताना दिसत नाहीये. राज ठाकरे यांची सभा आणि संवाद यांचा प्रभाव मतपेटीतून उमटला नसल्याचे चित्र आहे.



प्रमुख शहरांमधील मनसेची पीछेहाट


राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात १६५ जागांपैकी १२२ जागांचे कल हाती आले असून तिथे मनसेला एकही जागा मिळालेली नाही. ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये मनसेला प्रत्येकी केवळ १ जागा मिळाली आहे. नाशिकमध्ये २ तर अहिल्यानगरमध्ये ३ उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी मनसेला केवळ ४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. याशिवाय नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूरसह एकूण २२ शहरांमध्ये मनसेचा पूर्णपणे सफाया झाला आहे.



कोणत्या शहरात मनसेचा सफाया?


ज्या २२ शहरातील महानगपालिका निवडणुकीत मनसेला खातं उघडता आलेलं नाही, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, परभणी, जालना, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून