अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या कारवाईचा शिवसेनेला फटका; भाजपची मुसंडी

रवींद्र चव्हाणांनी २४ तासांत सूत्रे हलवली


अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. भाजप–काँग्रेस युतीमुळे सुरू झालेल्या राजकीय भूकंपानंतर अवघ्या २४ तासांत भाजपने संपूर्ण चित्र पालटून टाकले, तर काँग्रेस अक्षरशः रिकामी झाली आहे. या घडामोडी शिवसेनेसाठी (शिंदे गट) धोक्याची घंटा मानली जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसच्या अनपेक्षित युतीची सर्वत्र चर्चा रंगली होती. या निर्णयावर काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले, तर अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती.


निलंबनानंतर २४ तासही उलटत नाहीत तोच काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अंबरनाथमधील काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आली असून, भाजपचे संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढले आहे.


चव्हाणांचा टॉप गियर; २०२९ ची तयारी:


भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी संघटनात्मक ताकदीवर भर दिला. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. खा. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय दिपेश म्हात्रे यांनीही कमळ हाती घेतले. भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील तणाव जुना असून, २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्यात भाजप बॅकफूटवर गेली होती; २०२४ नंतर चित्र बदलले. चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षपद आले. चव्हाण यांनी पक्षप्रवेशांचा सपाटा लावत शिवसेनेची (शिंदे गट) राजकीय कोंडी सुरू केली आहे. अंबरनाथ, बदलापूरसारख्या पारंपरिक शिवसेना गडांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष झाले, ठाणे जिल्ह्यात सत्तासंतुलन वेगाने बदलत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२९ च्या निवडणुकांसाठी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, चव्हाणांनी टाकलेला ‘टॉप गियर’ शिवसेनेसाठी (शिंदे गट) वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


संख्याबळात बदल, शिवसेनेची (शिंदे गट) कोंडी


अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला १४, काँग्रेसला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र आता १२ नगरसेवक भाजपमध्ये आल्याने सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपने नगराध्यक्षपद मिळवले असून, नव्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेला (शिंदे गट) उपनगराध्यक्षपद व समित्यांवरील दावा कमजोर झाला आहे.

Comments
Add Comment

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर