पुणे : पुण्यात मित्रच निघाले पक्के वैरी... मित्रांनीच दुसऱ्या मित्राला मारहाण करत जीवानिशी मारल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. ही घटना आहे पुणे शहरातील विश्रामवाडी येथे घडली असून, काही दिवसांपूर्वी विश्रामवाडी येथील एक १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची बातमी पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्या मुलाचा शोध घेत असताना या मुलाची हत्या झाल्याचे पोलिसांना कळले. मृत मुलाचे नाव ( अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड ) आहे. मुलाची चाकूने गळा चिरून अमानुषपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
खेड शिवापूर येथील वर्तमुख मंदिराच्या डोंगराळ परिसरात २९ डिसेंबरच्या दिवशी मैत्रिणीच्या सांगण्यावरून अमनसिंग ठिकाणी भेटायला गेला. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले, तेवढ्यात धबाले नावाचा मित्र तिथे आला. तो अमनसिंगला डोंगरावर घेऊन गेला आणि इतर मित्रांनाही तिथे बोलावलं. नंतर आरोपींनी अमनसिंग सोबत पार्टी केली. अमनसिंगला भरपूर बिअर पाजण्यात आली. यानंतर गळयावर कोयत्याने वार करत अमनसिंगची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर डोकं दगडाने ठेचून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला.
अमनसिंग घरी न आल्याने त्याच्या आईने तक्रार केली. आईच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा खून केल्याची आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली.