पालिका निवडणुकीचा बहुरंगी महासंग्राम
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील राजकारण तापले असून, यंदा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची अपेक्षित युती न घडल्याने सत्तासंघर्ष अधिक रंगतदार ठरणार आहे. मतदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने बहुरंगी ठरणार आहे. राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक गटांनीही मैदानात जोरदार तयारी केली आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा यांच्यातील समीकरणे ढवळून निघाल्याने राजकीय अनिश्चितता वाढली आहे. याशिवाय टीम ओमी कलानी, साई पक्ष, काँग्रेस, अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि बसपा असे विविध पक्षही मैदानात उतरल्याने सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती लागणार याबाबत चर्चेला वेग आला आहे.
तिकीट वाटपात अनेक दिग्गज उमेदवार डावलले गेले, त्यामुळे अपक्ष उमेदवारींचा वाद उफाळून आला. परिणामी, काही प्रभागांमध्ये त्रिकोणी, तर काही ठिकाणी चतुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. शहरातील सत्ता, विकास आणि राजकीय वर्चस्वाचा फैसला १६ जानेवारीला मतपेटीतून होणार आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा अधिक आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेला असणार आहे.
निवडणूक प्रभागांचा आढावा
२० प्रभागांतील ७८ जागांसाठी एकूण ७०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी ६१८ अर्ज वैध ठरले, तर १८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेर ४३२ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. शहरात ४ लाख ३९ हजार ९१२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत (पुरुष : २ लाख ३२ हजार ७३६; महिला: २ लाख ७ हजार २२; इतर: १५४).






