भाजपचं ठरलंय; आता थांबायचं नाय!

गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप सर्व प्रकारे व्युहरचना करीत आहे. आमदार राजन नाईक, खासदार डॉ हेमंत सवरा यांच्याकडे निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची जबाबदारी दिल्यानंतर, त्यात आणखी भर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांच्याकडे सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी वसई-विरारमध्ये येत गटबाजी न करता निवडणुकीला सामोरे जा, कोणतेही हेवेदावे होता कामा नये असा इशाराच मुख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला आहे. आणि मुख्यमंत्री विशेष लक्ष ठेवून आहेत याची जाणीव सुद्धा करून दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते.


तर दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढविलेले आणि कुठल्याही परिस्थितीत बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करूनच काँग्रेसने निवडणूक लढवावी अशी ठाम भूमिका घेणारे काँग्रेस नेते विजय पाटील यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या हाती बहुजन विकास आघाडीचा झेंडा दिला आहे. तर बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी झाल्याबाबत गवगवा करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांचाच त्यांच्या प्रभागात "गेम" झाला आहे. एवढच काय, काँग्रेसच्या १० उमेदवारांपैकी ९ उमेदवारांसमोर बहुजन विकास आघाडीचे उमेदवारच प्रतिस्पर्धी आहेत. परिणामी विजय पाटील यांचे "आप्पा"सोबत जमल्याचे चित्र असून, जिल्हाधक्ष ओनिल आलमेडा हे मात्र उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींना काय सांगावे याचीच उत्तरे शोधत आहेत.


वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडी सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वी सुद्धा विविध निवडणुकांमध्ये केलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडी सोबत लढली असती तर बोईसर आणि वसई हे दोन मतदारसंघ या आघाडीला राखता आले असते. असा कयास अद्यापर्यतही लावल्या जात आहे. त्यामध्ये तथ्यसुद्धा आहे कारण वसई विधानसभा मतदारसंघात ७४ हजार ४०० एवढे मतदान माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना मिळाले होते, तर काँग्रेसच्या विजय पाटील यांनी सुद्धा ६२ हजार ३२४ एवढे मतदान मिळवले होते. दरम्यान, विधानसभेमध्ये झालेली चूक वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये होऊ नये, यासाठी विजय पाटील यांनीच यावेळी पुढाकार घेतला. काँग्रेस पालिकेच्या सत्तेत हवी असल्यास बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करून लढणे हा एकच पर्याय काँग्रेस समोर असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले आणि प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्या कन्या आणि सुनेला बहुजन विकास आघाडी कडून निवडणूक रिंगणात उतरविले. तथापि, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे असे गृहीत धरले तरी, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीची "आघाडी" करण्यात मात्र ते यशस्वी ठरले नाहीत.


दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत काँग्रेस बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढवीत असल्याचे ठामपणे सांगणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्यासह काँग्रेसच्या ९ उमेदवारांसमोर बहुजन विकास आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. त्यामुळे या आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा वसई विधानसभा प्रभारी जोजो थॉमस यांनी आम्ही आघाडी धर्म पाळला, बहुजन विकास आघाडीलासुद्धा पाळावा लागेल असा आशावाद व्यक्त करीत आहेत.


परिणामी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतरही काँग्रेस नेत्यांना बहुजन विकास आघाडीकडून वेगळी आशा असल्याने, तुझे माझे जमेना आणि...करमेना अशीच अवस्था बहुजन विकास आघाडीबाबत काँग्रेसची झाली आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.


दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार : जोजो थॉमस


गेल्या वर्षी झालेल्या वसई विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रभागात काँग्रेस नंबर वन राहिली आहे. काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास हजारो मतांचा फरक भाजप उमेदवाराला मिळालेल्या मतांमध्ये आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आम्ही बहुजन विकास आघाडी सोबत महापालिका निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे आम्ही १०५ जागांवर उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. बहुजन विकास आघाडी सोबत चर्चा करून , त्यांनी सुद्धा काँग्रेसने उमेदवार दिलेल्या ९ जागांवर आघाडी धर्म पाळावा अशी मागणी आम्ही करणार आहात. तसे न झाल्यास येत्या दोन दिवसात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. असे काँग्रेसचे वसई विधानसभा प्रमुख तथा प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जोजो थॉमस यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक