सदानंद दातेंनी पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला


मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक अर्थात डीजीपी या पदाची सूत्रं स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर डीजीपी सदानंद दाते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. सदानंद दातेंची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. आवश्यकता भासल्यास या कालावधीत वाढ अथवा कपात करण्याचे सर्व अधिकार राज्य शासनाकडे आहेत.


भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) १९९० च्या बॅचचे अधिकारी असलेले सदानंद दाते शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून ते सूत्रं स्वीकारतील. गृह मंत्रालयाने बुधवार ३१ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.


मार्च २०२४ पर्यंत सदानंद दाते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते, त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) नेतृत्व करण्यासाठी नवी दिल्लीला गेले. राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांना दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले.



कोण आहेत सदानंद वसंत दाते ?


कसाबसह दहा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत हल्ला केला होता. यापैकी दोन दहशतवाद्यांशी दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयात थेट संघर्ष करणाऱ्या सदानंद दाते यांना राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. दातेंनीच पुढे जिवंत पकडलेल्या कसाब या दहशतवाद्याशी संबंधित प्रकरणाचा तपास केला होता.


सदानंद दाते यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख, मुंबई सहपोलीस आयुक्त (गुन्हे), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), कायदा व न्या विभागाचे संयुक्त सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या फोर्स वन या कमांडो पथकाचेही नेतृत्व केले आहे.


काही वर्षांपूर्वी बिहारच्या राहुल राजने मुंबईत प्रवाशांसह बेस्ट बसचे अपहरण केले होते. राज ठाकरेंना ठार मारायचे आहे त्यांच्या घरी बस घेऊन चला असे म्हणत या तरुणाने दहशत निर्माण केली होती. अखेर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चतुराईने परिस्थिती हाताळत सदानंद दाते यांनी राहुल राजला चकमकीत ठार केले होते. दातेंनी २६/११ च्या वेळी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली होती. त्यावेळी चकमकीत जखमी झालेल्या दातेंना नंतर राष्ट्रपतींनी शौर्य पदकाने गौरविले होते.


दातेंनी हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठातून व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी उच्च शिक्षण घेतले होते. जर्मन फेडरल पोलिसांच्या विशेष युनिट GSG-9 (Grenzschutzgruppe-9) सोबतही त्यांचे विशेष प्रशिक्षण झाले आहे.


Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक