ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची तोफ धडाडणार
मुंबई : जागावाटप आणि बंडखोरांची मनधरणी करून झाल्यानंतर, महायुतीने आता प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या ३ जानेवारी रोजी वरळीतील एनएससीआय डोम (वरळी डोम) येथे महायुतीची पहिली भव्य जाहीर सभा होणार असून, या सभेने मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे, ही सभा उबाठा गटाच्या बालेकिल्ल्यात आयोजित करून महायुतीने थेट ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.
७ वर्षांनंतर उत्पादन शुल्कात मोठी वाढ नवी दिल्ली : देशातील तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत १ फेब्रुवारी २०२६ पासून मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने ...
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, निकाल १६ जानेवारीला जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर महायुतीची ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेतून महायुतीची एकजूट आणि ताकद मुंबईकरांसमोर ठळकपणे मांडली जाणार आहे. जागावाटप, उमेदवार निवड आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, या सभेतून महायुतीकडून मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट, प्रचाराची दिशा आणि शहरासाठीचे भविष्यकाळातील व्हिजन स्पष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
१२ दिवसांत प्रचाराचा धडाका
भाजप आणि शिवसेनेसह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांची या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा संचार करणे आणि उमेदवारांना बळ देणे, हा या सभेचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १२ दिवसांत मुंबईत विभागनिहाय सभा, रोड शो आणि प्रचार फेऱ्यांचा धडाका लावला जाणार असून, ३ जानेवारीची वरळी डोममधील ही सभा त्याची नांदी ठरेल. राजकीय वर्तुळाचे या सभेकडे विशेष लक्ष लागले आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचारसभा ५ जानेवारीपासून सुरू होणार असताना, दुसरीकडे महायुतीची ही पहिली सभा ठाकरेंच्याच प्रभावक्षेत्रात होत असल्याने निवडणुकीतील वातावरण अधिकच चुरशीचे होईल, असे बोलले जात आहे






