मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मतदानाआधीच मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ या दोन महत्त्वाच्या प्रभागांत महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने या दोन्ही जागा अक्षरशः हातातून निसटल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाद झाल्यामुळे या वॉर्डमध्ये महायुतीला माघार घ्यावी लागली असून, याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होणार आहे.
वॉर्ड क्रमांक २११ मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील असल्याने भाजपने येथे विशेष तयारी केली होती. मात्र उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाच्या छाननीत त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. परिणामी या प्रभागात कमळ किंवा धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना दिसणार नाही.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये घडलेल्या घटनेने महायुतीची अडचण अधिकच वाढवली. या वॉर्डमधून भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही मिळाला होता. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार वेळ संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जात नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज थेट बाद ठरवण्यात आला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्ड निर्णायक ठरणार असताना, दोन प्रभागांमध्ये उमेदवारच नसणे ही महायुतीसाठी नामुष्की मानली जात आहे.आता या दोन वॉर्डमधील महायुतीचे मतदार कोणत्या दिशेने मतदान करतात आणि त्याचा फायदा कोणाला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.