मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार


मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यानंतर एमएसआरडीसीने महामार्गाच्या संरेखनाच्या कामाला सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर अशा सहा जिल्ह्यांतून जाणार आहे.


एमएसआरडीसीच्या चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पांत कल्याण–लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश होता. मात्र अनेक वर्षे हा प्रकल्प कागदावरच होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचे सादरीकरण पाहिल्यानंतर तो तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देत प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर विधानसभेत अधिकृत घोषणा झाल्याने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. मराठवाड्याचा, विशेषतः लातूर परिसराचा विकास साधणारा हा महामार्ग असल्याने त्याला ‘जनकल्याण महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर सल्लागारांच्या माध्यमातून संरेखनाचे काम सुरू करण्यात आले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.


यापूर्वी हा महामार्ग कल्याण, माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड, मांजरसुंबा आणि अंबेजोगाई मार्गे लातूरकडे जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा आणि निलंगा असा हा महामार्ग जाण्याची शक्यता आहे. अंतिम संरेखन जाहीर झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता येणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.


दरम्यान, हा महामार्ग आपल्या-आपल्या जिल्ह्यातून जावा यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. धाराशीवचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर-कळंब-जामखेड-अहिल्यानगर मार्गे कल्याणपर्यंत महामार्ग नेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर बीड जिल्ह्याला वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्प बीडमधूनच नेण्याची मागणी केली आहे. बीडला वगळल्यास जनतेत असंतोष निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या मागण्या लक्षात घेतल्या जात असल्या तरी तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या योग्य असेल तेच संरेखन अंतिम केले जाईल, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बीड आणि धाराशीव या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांतून हा महामार्ग जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत

Mumbai Accident : वर्सोवा-जुहू लिंक रोडवर भीषण अपघात; भरधाव बसने अनेक गाड्यांना दिली धडक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर