अवयवदानातून मिळाले ६ रुग्णांना जीवदान

ठाणे : ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही ठाण्यातील एका कुटुंबाने धैर्याने घेतलेल्या निर्णयामुळे सहा गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकले. ठाण्यात घडलेली ही पहिलीच अवयवदानाची घटना असून ठाणे, मुंबई आणि दिल्लीतील रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले आहेत.


हाजुरी परिसरात राहणाऱ्या या महिलेला मेंदूत रक्तस्राव झाल्याने १९ डिसेंबर रोजी महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप आशर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच २५ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी महिलेला ब्रेन डेड घोषित केले. या अत्यंत कठीण क्षणी डॉक्टरांनी कुटुंबीयांशी संवाद साधत अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. समाजहिताचा विचार करत कुटुंबीयांनी आपल्या वैयक्तिक दुःखावर मात करत अवयवदानाचा मोठा निर्णय घेतला.


२६ डिसेंबर रोजी शेवटी डॉक्टरांनी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेत यकृत, दोन मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड आणि फुफ्फुस अशा सहा महत्त्वाच्या अवयवांचे दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. ठाण्याहून पवईपर्यंत अवघ्या १७ मिनिटांत हृदय पोहोचवण्यात आले आणि एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले.


या अवयवदानातून पाच अवयव मुंबईतील रुग्णांना, तर एक अवयव ठाण्यातील रुग्णाला प्रत्यारोपणासाठी देण्यात आला. महिलेच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून जैन ट्रस्ट आणि महावीर जैन हॉस्पिटलतर्फे तिच्या ९ वर्षांच्या मुलीच्या भविष्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये, अशा एकूण दोन लाख रुपयांची मुदत ठेव देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


ब्रेन डेड घोषित झाल्यानंतर ठराविक वेळेत अवयवदान झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. यासाठी नागरिकांमध्ये अधिक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. विनीत रणवीर यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

'गिल्बर्ट हिल नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करा'

मुंबई : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात

कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार कारवाई

मुंबई : क्षेत्र विकासाच्या कामांदरम्यान काही खाजगी विकासकांनी कांदळवनापासून ५० मीटर अंतराच्या बफर झोनमध्ये

मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करणार

उपमहापौर संजय घाडी यांची घोषणा मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्यास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौरांची निवड पाहण्यासाठी प्रथमच बसले सभागृहाच्या गॅलरीत

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महापालिका सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो आहे. अशा प्रकारे मी पहिल्यांदाच

मुलुंड स्टेशन परिसरातील एस व्ही पी मार्ग क्लिअर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुलुंड (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ६१ अनधिकृत बांधकामे मुंबई