महायुतीचा फॉर्म्युला ठरला

मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?


राष्ट्रवादीच्या महायुतीमधील समावेशाची शक्यता धूसर


मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भाजप १४० आणि शिवसेनेने ८७ जागा लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.


या निर्णयामुळे महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश मुंबईत होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादीला मुस्लीमबहुल प्रभागातील १०-१५ जागा हव्या होत्या, मात्र भाजपच्या आक्षेपामुळे आणि जागावाटपाच्या मर्यादेमुळे राष्ट्रवादीला मुंबईतून बाहेर ठेवण्यात आले आहे. अंतिम सूत्रानुसार मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी भाजप १४० जागा लढवणार असून, शिवसेनेला ८७ जागा मिळणार आहेत. रिपाइं आणि रिपब्लिकन सेनेसह छोट्या मित्रपक्षांनाही काही जागा सोडल्या जाणार आहेत.


दरम्यान, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून सोमवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे; तर शिवसेनेकडून थेट संबंधित उमेदवाराला बोलावून 'एबी' फॉर्म दिला जाईल, असे कळते.


छोट्या मित्रपक्षांना मिळणार वाटा


महायुतीतील छोटे मित्रपक्षही या जागावाटपात समाविष्ट आहेत. रामदास आठवले यांच्या रिपाइंला (आरपीआय) भाजपच्या कोट्यातून जागा सोडल्या जाणार आहेत; तर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला शिवसेनेच्या कोट्यातून काही जागा दिल्या जाणार आहेत.


महायुतीत कोणताही संभ्रम नाही! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई पालिकेत भाजप-शिवसेना एकत्र लढत असल्याची घोषणा कधी होणार, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, महायुतीची घोषणा करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत आणि आमच्यात कोणताही संभ्रम नाही. विरोधकांकडून सोडल्या जाणाऱ्या पुड्या या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आहेत. आमच्यातील एकजूट कृतीतून दिसते, घोषणांमधून नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येणार असतील, तरच त्यांना घोषणा करावी लागते, असा उपरोधिक टोलादेखील त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला लगावला. त्यांनी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यात नेमके काय सुरू आहे, हेच कुणालाच कळत नाही. पण, महायुती योग्य वेळी योग्य पद्धतीने आपली भूमिका जाहीर करेल, असे फडणवीस म्हणाले.


राष्ट्रवादी महायुतीत नाही?


राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत महायुतीत स्थान मिळण्याची अपेक्षा होती. पक्षाने मुस्लीमबहुल २५ प्रभागांपैकी १०-१५ जागांची मागणी केली होती. मात्र, नवाब मलिकांवर भाजप नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे राष्ट्रवादीला मुंबईतून दूर ठेवण्यात आले.


नेमके काय घडले? : भाजप-शिवसेनेत गेल्या काही आठवड्यांपासून जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. पहिल्या फेरीत भाजपने शिवसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव नाकारत १२५ जागांची मागणी लावून धरली होती. त्यानंतर भाजपने त्यांना ७२ जागांचा नवा प्रस्ताव दिला. त्यालाही शिवसेनेने नकार दिला. अलीकडील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील निकालांमुळे शिवसेनेची बॅर्गेनिंग पॉवर वाढली. या निवडणुकीत भाजप पहिला मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. परिणामी, मुंबईतील जागावाटपात त्यांना सन्मानजनक वाटा मिळाला.


विदर्भात भाजप-शिवसेना एकत्र




  •  विदर्भात महायुती स्वतंत्र लढणार की एकत्र याबाबतीत निर्णय झाला आहे. महायुतीची नागपुरात शुक्रवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत, संजय राठोड आणि राज्यमंत्री आशीष जयसवाल यांच्यासह अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चार महानगरपालिका क्षेत्रांतील समन्वयाची जबाबदारी असलेले शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते.





  • या बैठकीत चारही महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना महायुती करण्याचा निर्णय जवळपास अंतिम झाला आहे. २४ तासांत जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत येण्याचे संकेत आहेत. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांचा पक्ष महायुतीसोबत येत आहे, असे ते म्हणाले.





  • चंद्रपूरमध्येही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सर्वांनी त्यांचे नेतृत्व मान्य केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.





  • नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. २७ डिसेंबरपर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप ४५ ते ५० जागेवर लढणार आहे, तर
    १८ ते २० जागा शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टीला
    ९ ते १२ जागा देण्याचे ठरवण्यात आल्याचे कळते.

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Radhakrishna Vikhe Patil : “जरांगेंचं समाधान होत असेल तर राजीनाम्यास तयार”; विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं असून, मराठा आंदोलक नेते मनोज

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा