महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात
काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा वाढला
ठाणे : ठाणे महापालिकेत गेली अनेक वर्षे सत्ता राखणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आव्हान उभे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेसने दिलेला ३५ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीतील नेत्यांनी मान्य केलेला नसल्यामुळे जागावाटपाचा तिढा वाढला आहे. येत्या ४८ तासांत आघाडीचा निर्णय झाला नाहीतर, वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी, ठाणे महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसने महाविकास आघाडीत निवडणुक लढवून एकजूट दाखविण्याचा निर्णय घेतला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मोठी ताकद असून निवडणुकीत त्यांच्यापुढे आव्हान उभे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपाची बोलणी सुरू केली होती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. यात जागावाटपात काँग्रेसला ९ ते १२ जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दाखविण्यात आली; परंतु काँग्रेस पक्षाने ३५ जागांचा प्रस्ताव मांडून तेवढ्या जागा देण्याचा आग्रह धरला. ठाणे शहरातील बहुसंख्य जागा शिवसेना आणि मनसेला सोडण्यात येणार आहेत. मात्र, यातील काही जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. त्यात मानपाडा, बाळकुम, खारटन रोड, कोपरी यासह इतर प्रभागातील जागांचा समावेश आहे. काँग्रेसने मांडलेला प्रस्ताव मान्य नसल्यामुळे बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. एकूणच काँग्रेसच्या प्रस्तावामुळे जागावाटपाचा तिढा वाढला आहे. त्यातच येत्या ४८ तासांत आघाडीचा निर्णय झाला नाहीतर, वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला.
उमेदवारांची अदलाबदली:
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाणे शहर तसेच घोडबंदर भागातील बहुसंख्य जागा शिवसेना (उबाठा) आणि मनसेला सोडण्यात येणार आहेत. परंतु या जागावाटपात दोन्ही पक्षांमध्ये तिढा राहू नये यासाठी काही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना मनसेतून उमेदवारी दिली जाणार आहे, तर मनसेच्या काही उमेदवारांना उबाठातून उमेदवारी दिली जाणार आहे.
काँग्रेसचा इशारा
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अद्याप अधिकृत जागावाटप झालेले नसतानाही कळवा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला; परंतु या कृती विरोधात आक्षेप नोंदवत राष्ट्रवादीचे हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नाही, अशी टिका काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली. कळव्यात आमच्याकडे चार चार उमेदवार तयार असून तेवढे मतदारही आहेत. यामुळे काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही. ४८ तासांत राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा, यांची संस्थाने खालसा व्हायला वेळ लागणार नाही. तसेच काँग्रेसकडे स्वबळावर लढण्याचा शेवटचा पर्याय असेल, असा इशाराही त्यांनी दिला.






