‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक
नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था कोलमडली, तेव्हा हजारो प्रवाशांना विमानतळांवर तासनतास वाट पाहावी लागली. अनेकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचता आले नाही. या संकटाने एक कठोर वास्तव उघड केले. देशाच्या विमान वाहतूक क्षेत्र इंडिगोच्या एकाधिकारशाहीमुळे ही परिस्थिती उद्भवली. अशातच आता भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना मंजुरी दिली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केरळ येथील अल हिंद एअर आणि हैदराबाद येथील फ्लाय एक्स्प्रेस या दोन नवीन विमान कंपन्यांना ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (एनओसी) जारी केले आहे. यामुळे इंडिगो आणि एअर इंडियाच्या वर्चस्वाला आव्हान मिळणार असून, प्रवाशांना अधिक पर्याय आणि स्वस्त तिकीट दर मिळण्याची शक्यता आहे. अल हिंद एअर ही अलहिंद ग्रुपची कंपनी असून, ती पर्यटन आणि प्रवास क्षेत्रात कार्यरत आहे, तर फ्लाय एक्स्प्रेस ही कुरियर आणि कार्गो सेवेत असलेली कंपनी आहे. यादी उत्तर प्रदेशातील शंख एअरला एनओसी मिळाली असून, तीही लवकरच सेवा सुरू करणार आहे. केंद्र सरकारने ही मक्तेदारी मोडून प्रवाशांना चांगले पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
सध्या भारतीय हवाई क्षेत्रात दोन प्रमुख कंपन्यांचे वर्चस्व आहे. इंडिगो आणि टाटा ग्रुप (एअर इंडिया). आकडेवारी दर्शवते की सुमारे ९०% देशांतर्गत प्रवासी या दोन्ही कंपन्यांच्या सेवा वापरतात. म्हणूनच, जेव्हा एका एअरलाइनला समस्या येते तेव्हा संपूर्ण व्यवस्था विस्कळीत होते आणि सामान्य माणसाला त्याचा फटका सहन करावा लागतो. हा धोका कमी करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी कारवाई केली आहे.
याबाबत नायडू सांगितले की, 'बाजारात निरोगी स्पर्धा निर्माण करण्यासाठी सरकार नवीन विमान कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. गेल्या आठवड्यात मंत्रालयाने तीन नवीन कंपन्यांच्या टीमशी बैठक घेतली आहे.' मंत्र्यांच्या या पावलावरून स्पष्ट होते की, सरकार आता मनमानी भाडे आणि विलंबापासून जनतेला दिलासा देण्यासाठी बाजारात नवीन पर्याय निर्माण करू इच्छित आहे. ज्या दोन कंपन्यांना हिरवा कंदील मिळाला आहे, त्यांची पार्श्वभूमी मनोरंजक आहे.