नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, पक्षप्रवेश, शक्तिप्रदर्शन आणि अंतर्गत समीकरणांमुळे निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस तसेच शिवसेना (उबाठा) गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे गट)प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणाची गणिते झपाट्याने बदलताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महापौरपदाची थेट लढत ही शिंदे गट आणि भाजप यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


शिवसेना (शिंदे गटाने) अलीकडच्या काळात केलेले पक्षप्रवेश केवळ संख्याबळापुरते मर्यादित नसून, त्यामागे निवडणुकीसाठीची ठोस रणनीती असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नुकत्याच ऐरोली येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्याने पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली आहे.


या प्रवेशांनंतर शिवसेना शिंदे सेनेकडे ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ झाले असून, भाजपकडेही तितकेच ५४ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष समसमान बळावर उभे ठाकले असून, सत्तेसाठीची चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ५६ नगरसेवकांचा जादुई आकडा आवश्यक असल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे किमान ६० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे बोलले जात आहे.


गेल्या सुमारे २५ वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. त्या एकहाती सत्तेला आव्हान देण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) सज्ज झाली असून, संघटनात्मक बांधणी, इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि प्रभागनिहाय रणनीती आखण्यात पक्षाने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपनेही बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत करण्यावर भर देत कोणतीही ढिलाई न ठेवण्याचा निर्धार केला आहे.


महायुतीच्या भवितव्याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. महायुती झाल्यास भाजप आणि शिंदे गटात समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जागावाटपावर एकमत न झाल्यास दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता असून, त्यावेळी थेट संघर्ष अटळ ठरणार आहे.


एकूणच नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, राज्यातील सत्तासमीकरणांवर प्रभाव टाकणारी प्रतिष्ठेची लढाई ठरणार असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत होणारे पक्षप्रवेश, जागावाटपाचे निर्णय आणि महायुतीबाबतची भूमिका यामुळे या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या