वाडा पालिकेत स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षही भाजपचा
गणेश पाटील पालघर : जिल्ह्यात निवडणूक झालेल्या तीन नगर परिषदांपैकी दोन नगर परिषदेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर वाडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा भाजपने स्वबळावर नगराध्यक्ष आणि पालिकेतील बहुमत मिळवले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने पालघर, वाडा, जव्हार आणि डहाणू या चारही ठिकाणी चांगलीच मुसंडी मारली आहे. तसेच पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा हे राहत असलेल्या वाडा नगरपंचायतवर सुद्धा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे महायुतीच्या वादात अडकलेल्या या निवडणुकीत खासदारांनी योग्य ‘फिल्डिंग’ लावून वाडा हे आपले ‘होम ग्राउंड’ चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे.
वाडा नगर पंचायतीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदारांच्या भगिनी निशा सवरा या भाजपच्या उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. १७ सदस्यीय असलेल्या या नगरपंचायतीत २०१७ मध्ये भाजप ६, शिवसेना ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि आरपीआयचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. त्यावेळी शिवसेनेच्या गीतांजली कोल्हेकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. दरम्यान, यावेळी घेण्यात आलेल्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये सुद्धा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आले आहेत. तथापि, राज्यात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात फारकत घेण्यात आली होती. अशा परिस्थितीत केवळ स्वबळावर निवडणूक लढवून भाजपला तीन ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवून देणे कठीण बाब होती.
मात्र खासदार डॉ. सवरा यांनी या निवडणुकीच्या पूर्वीच काही ठिकाणी इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला. वाडा या ठिकाणी गेल्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रिमा हर्षद गंधे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरविले. त्याचप्रमाणे राजकारण आणि समाजकारणात असलेल्या चेहऱ्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढण्याची संधी दिली.
इतर तीन ठिकाणचा प्रचार, नेत्यांच्या सभा, आणि पक्षाच्या बैठका, सांभाळून वाडा नगरपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळेच या ठिकाणी १७ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या. आता नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगले काम केले आहे. परिणामी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे.






