Sunday, December 21, 2025

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नव्या दरांची अंमलबजावणी येत्या २६ डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकिटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी २१५ किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत. मात्र, जनरल तिकिटाचे दर २१५ किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर १ पैसा, तर मेल आणि एक्सप्रेस नॉ एसीसाठी २ पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी २ पैसे अधिक मोजावे लागतील.

रेल्वेने प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थितीसमोर मांडली असून, प्रवास भाडे वाढवल्याने रेल्वेला या वर्षात ६०० कोटी रुपये मिळणार आहेत. ५०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १० रुपये अधिक द्यावे लागतील.

गेल्या १० वर्षांत रेल्वेने नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्याने खर्च १,१५,००० कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील ६० हजार कोटींनी वाढला आहे. २०२४-२५ मधील रेल्वे चालवण्याचा खर्च २६,३०००कोटी रुपये झाला आहे.

भारतीय रेल्वेने २०२५ मध्ये दुसऱ्यांदा प्रवास भाडे वाढवले आहे. यापूर्वी जून महिन्यात रेल्वेने प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. १ जुलै २०२५ पासून रेल्वे प्रवास भाडे वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पाच महिन्यातच रेल्वेने प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment