विशेष : डॉ. विजया वाड
“शंत्या”
“आई, कितीदा तुला सांगितलं आहे.”
“काय म्हणणंय तुझं शंत्या”
“मला शंतनूराव हाकार.”
“अरे बापरे! आजोबा म्हणतात, तेवढं पुरेसं नाही?”
“आई, तू पण म्हण ना गं. मला आवडतं राव म्हटलं की.”
“शंत्या, शहाणपणा करू नकोस हं.”
“आता मी मोठा झालोय गं आई.”
“आठ वर्षांचा तर आहेस नकट्या.”
“अपशब्द आहे तो. न वरून सुरुवात झालेला”
“बराच टिक्कोजीराव झालास रे नकचढ्या.”
“आई, आजोबांची हाक मला आवडते. तूही त्यांचीच हाक अंगिकार.”
आई बघतच राहिली, शंतनूकडे.
“शंतनूराव” तिनं हार पत्करली.
“आता कशी वठणीवर आलीस ग आई.”
“आईला असं बोलू नये बाळ.”
“आजोबा म्हणतात, बघेन बघेन आणि सुनेला वठणीवर आणेन.”
“काय बिशाद लागलीय त्यांची.”
“तू घाबरत नाहीस आजोबांना”
“छन छन रुपये ठेवते ना त्यांच्या हातावर.”
“चाळीस हजार ना? आजोबांचं पेन्शन पन्नास हजार आहे”
“हल्ली पेन्शनीत वाढ झालीय त्यांच्या. मिजास वाढलीय त्यांची. शंतनू त्यावर काही बोलला नाही. कारण आजोबांना उलट उत्तर द्यायची त्याची आई. मग बाबा चिडायचे. मग वाद. मग जोरा-जोरात भांडण. नको रे बाबा! नको भांडण, नको वाद! घरात असूदे फक्त संवाद! असं आजोबाच म्हणायचे. आता ते बोलतच नाहीत. सून दीडशहाणी आहे, असं आपल्याला सांगतात. तिला बोलणेच नसते त्यांचे. कोण उलट उत्तरे सहन करणार ना?
पण होत्याचे नव्हते झाले. आजोबा फटकन् गेले. आजी तेवढी उरली. अगदी अबोल झाली. आजोबा गेले नि शंतनू अचारा-बिचारा झाला. एक कावळा नेमाने येई. खिडकीवर तासन् तास बसे. आजीला वाटे, ते आजोबाच आहेत. सारखी गप्पा मारी त्या पक्ष्यांशी. कावळ्याला चणे-दाणे टाकी. तांदूळ टाकी. कावळा काय? ते चणे-दाणे टिपे. तांदूळ टिपे. आजी आनंदून जाई. शंतनूला पण खुशी होई.
“अहो, शंत्या अभ्यास करीत नाही. दुसरीत गेला असता. एक सारखं कावळोबाशी बोलणं. तोही खिडकीवरनं हटत नाही. त्याला पिशवीत घालून दूर रानावनात सोडून द्या बघू.”
“मी?”
“मगं काय मी ? रानावनात जाऊ? संकोच कसा वाटत नै?”
“बरं बाई. बघतो कसं जमतं ते” बाबा म्हणाले. चाळीतल्या तरुण पार्टीकडून तो कावळा शंतू शाळेत गेल्यावर नि आजी झोपल्यावर त्यांनी पकडला. दूर रानावनात सोडून दिला. “झालं समाधान” त्यांनी बायकोला पुसलं. ती खूश होती. शंतू घरी आल्यावर त्यानं घर डोक्यावर घेतलं. पण त्यांच्या आवडत्या पॉपिन्सच्या गोळ्या दिल्यावर तो शांत झाला. आजी मात्र एकदम अबोल झाली. सुनेनं सोयीस्कर दुर्लक्ष केलं.
“शंतनू अभ्यास करीत नाही.” आईने आजीजवळ तक्रार केली.
“त्यांचा कावळा तू परस्थ केलास ना गो सुने.”
“अहो, मंत्रचाळेपणा करतो तो. चांगली हुषारी वाया चाललीय काही तरी करा आता हरले मी.”
आजोबा बर वाटलं. बरं बरं वाटलं. सून हरली म्हणून ! आता बघ, शंतूनला कसा वळवते ते ! तू तो कावळा परत आणं बाई.”
“पाखरं आपला मार्ग शोधून परत त्यांच्या जागी येतात.”
सून म्हणाली. आजीला ते पुरतं ठाऊक होतं.
“मी बघते हं. शंतूला पुस्तकात परत सुपसते.” आजी म्हणाली.
चार दिवसांत ‘आजोबा’ ऊर्फ कावळोबा आले. खिडकीवर स्थानापन्न झाले. आजी खूश झाली ! शंतनू आनंदला.
“आजोबा स्वप्नात आले शंतनूराव !” छोट्या आनंदाला.
“काय म्हणाले गं आजी?”
“शंतू कुठाल?” “मी म्हणाले, शाळेत गेलाय.”
“मग? मग काय म्हणाले आजोबा?”
“मला छान स्वप्न पडलं, असं म्हणाले.”
“काय होतं गं आजी स्वप्न?”
“शंतनूरावांचा पहिला नंबर आला. आजोबांनी टाळ्याच वाजवल्या.”
“कावळा टाळ्या वाजवतो?”
“अरे वचावचा चोच आपटतो.”
“तुला छान समजतं ग आजी.”
“कावळा कानांत म्हणाला, शंतनूराव पहिले आले.”
“खरंच आज्जी?” “शपथ रे शंतू”
आणि संतनूने अभ्यासाचे पुस्तक हाती घट्ट धरले, आई आनंदली...