भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक घटना समोर आली आहे. कोहोजगाव परिसरातील एका सभागृहात पहाटे शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी जमल्याचे आढळले. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, हे सर्व लोक प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. या माहितीनंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या गर्दीबद्दल गोंधळ घालण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वातावरण चांगलेच तापले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट आरोप केला की या महिला बोगस मतदान करण्यासाठी आणल्या गेल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून सभागृहातील लोकांना बाहेर काढले असून, बोगस मतदानाच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी, प्रभाग क्रमांक २९ मध्ये हा गोंधळ पाहायला मिळाला आहे. ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांना सर्वच उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला.
या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने दुसरं मशीन मागवण्यात आलं होतं. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जे कर्मचारी मशीन घेऊन आले त्यांच्या आयकार्डवर फोटो आणि नाव तसंच सही, शिक्का देखील नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्याची चांगलीच बोबडी वळली होती.
अंबरनाथ २५ नंबर वॉर्डमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. वातावरण तापल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परिसरात तणाव होता. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
पैसे वाटल्याचा आरोप : अंबरनाथ शहरातील मातोश्री नगर परिसरात आज मतदानाच्या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रभाग २८ मध्ये मतदारांना पैसे वाटताना दोन व्यक्ती रंगेहाथ पकडले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या दोघांना ताब्यात घेत पोलीसांकडे सुपूर्द केले. भाजपकडून शिंदे गटाच्या शिवसेनेवर पैसे वाटप केल्याचा आरोप केल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परिसरात एकत्र आले आणि मोठा राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. आज राज्यातील इतर नगरपालिकांमध्येही मतदान सुरू असून, अनेक ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकमेकांविरोधात लढत आहेत. अंबरनाथमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाचे वातावरण जाणवले आहे.






