Friday, December 19, 2025

महायुती झाली; आघाडीसाठी खलबत्ते !

महायुती झाली; आघाडीसाठी खलबत्ते !

सर्वच राजकीय पक्षांचा सोबत लढण्यावर भर

विरार : वसई - विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी युती-आघाडीचा मार्ग धरल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाने) युतीची अधिकृत घोषणा नुकताच केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासह आरपीआय (आठवले) यांना देखील सोबत घेण्यात येणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आले. तर दुसरीकडे बविआला सोबत घेऊन ही निवडणूक लढावी यासाठी, शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे या तीन राजकीय पक्षांनी बविआ कडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी दोन तीन दिवसात आघाडीबाबत सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे.

वसई - विरार महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमध्ये आघाडी आणि महायुतीबाबत चर्चा होत आहेत.भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात दोन आठवड्यापूर्वीच युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर बुधवारी भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) युती करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. या युतीबाबत शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपचे नेत्यांमध्ये संयुक्त बैठक झाली. त्यानंतर आमदार राजन नाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनी युतीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. युतीमध्ये भाजप - सेनेसह राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले) आणि श्रमजीवी, आगरी सेना या संघटनांना महायुतीमध्ये सामील केल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. तर जागा वाटपाबद्दल स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वसई विरार दौऱ्यावर आहेत. या दिवशी शिवसेनेच्या जागा वाटपाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, एकीकडे महायुतीची घोषणा झाली असताना दुसरीकडे आघाडी साठी देखील चर्चा सुरु आहेत. नुकताच शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांनी बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत पालिका निवडणूक आघाडी करून लढण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर बुधवारी मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा ठाकूर यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. पालिकेवर सलग दोन टर्म बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. परिणामी महायुतीला रोखण्यासाठी स्थानिक बविआ सोबत हातमिळवणी करण्याकरिता शिवसेना ( उबाठा ), काँग्रेस आणि मनसे हे तीनही पक्ष उत्सुक आहेत. या आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्या असून, येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याचे बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तसेच केवळ बहुजन विकास आघाडीच्या बॅनर वर लढण्यासाठी प्रत्येक प्रभागातून ३० ते ४० अर्ज प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी दोन-तीन दिवसांत आघाडीबाबत होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment