Monday, December 15, 2025

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात हा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील ट्विस्ट म्हणजे हा अंधश्रद्धेचा प्रकार कोणत्याही माणसावर नाही तर बैलांवर करण्यात आला आहे. आपले बैल शर्यतीतील वर्चस्व कायम राखण्यासाठी तसेच प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने हा भानामती प्रकार केल्याचे समोर आले आहे. भादोले गावातील स्मशानभूमीत ग्रामस्थांना एक संशयास्पद लोटकं आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

एका कापडामध्ये बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद-कुंकू, गुलाल तसेच काळे उडीद बांधून ठेवण्यात आले होते. या साहित्याशिवाय कापडामध्ये एक विशेष गोष्ट आढळून आली, ती म्हणजे एका चिठ्ठीत परिसरातील टॉप बैलांची नावे आणि त्यांच्या मालकांची नावे स्पष्टपणे लिहिलेली आढळून आली. चिठ्ठीतील हा मजकूर पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली.

बैल शर्यतींमध्ये भादोले गावाची ओळख असून येथे अनेक नामांकित आणि विजेते बैल आहेत. त्यामुळे अशा प्रकारे थेट स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये संतापासह चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच चिठ्ठीतील नावे उघड झाल्यानंतर संबंधित बैलमालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. आपल्या बैलांना काही होईल का? शर्यतींवर याचा परिणाम होईल का? अशा अनेक प्रश्नांनी बैलमालक धास्तावले आहेत. काही नागरिकांनी हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकारामागे नेमके कोण आहे? हा केवळ भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? की प्रत्यक्षात कोणाच्या तरी जाणीवपूर्वक केलेली कृती आहे? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे भादोले गावात अंधश्रद्धा, स्पर्धात्मक द्वेष हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Comments
Add Comment