नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी आमदारांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे देण्यात आलेली नाहीत, असा मुद्दा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर १४ डिसेंबरपर्यंत (अधिवेशनाची समाप्ती होईपर्यंत) या लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी दिला. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकार्याला असे वाटत असेल की, विधिमंडळाच्या पीठासीन अधिकार्यांनी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्षवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.