मंत्री नितेश राणेंची टोलेबाजी; मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनासाठी लवकरच बैठक घेणार
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली. मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भास्कर जाधव यांना उत्तर देताना राणे म्हणाले, “भास्कर जाधव एकटे असताना वेगळ्या टोनमध्ये बोलतात, आदित्य ठाकरे असताना वेगळ्या टोनमध्ये बोलतात. आदित्य ठाकरे नसताना तर मिठीही मारतात,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
आमदार भास्कर जाधव यांनी मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, “१ जून ते १ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी असते, तेव्हा मच्छिमारांना उत्पन्नाचे साधन नसते. मासळीचे दर वाढले तरी बहुतांश पैसा दलालांकडे जातो, मच्छिमार उपेक्षित राहतात. म्हणूनच माथाडी बोर्डाच्या धर्तीवर मत्स्यविकास बोर्ड स्थापन केले होते. पण आज या बोर्डाची मुंबईत स्वतःची जागाही नाही. मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी यात लक्ष घालून मत्स्यविकास बोर्डाचे पुनरुज्जीवन करावे,” अशी सूचना जाधव यांनी केली.
यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी जाधव यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. “भास्कर जाधव यांनी खूप चांगली माहिती दिली. मी नक्कीच या बोर्डाची माहिती घेईन. त्यांनी केलेली सूचना अतिशय महत्त्वाची आहे. लवकरच याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ,” असे आश्वासन राणे यांनी दिले. तसेच, “जाधव यांचा अनुभव मच्छिमार आणि कोकणाला उपयोगी पडला तर आम्हाला आनंदच आहे,” असेही ते म्हणाले.
सिल्वर पापलेट माशांबाबत निवेदन
दरम्यान, सिल्वर पापलेट माशाच्या संख्येबाबत समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना राणे यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने ५ सप्टेंबर २०२३ रोजी सिल्वर पापलेटला ‘राज्य माशा’चा दर्जा दिला आहे. तसेच ५४ मासळी प्रजातींवर मासेमारी बंदी घातली आहे. “पापलेटची संख्या कमी होत असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. या प्रजातीच्या संरक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत,” असे त्यांनी सभागृहात निवेदन करताना सांगितले.