ठाणे : रेल्वे भरतीत उत्तर भारतीयांना जास्त संधी मिळते असा आरोप करत मनसेने ठाण्यात गडकरी रंगायतन चौकात एक सभा घेतली. या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली. ही तलवार म्यानातून काढून उपस्थितांना दाखवण्यात आली. राज ठाकरे यांनी रेल्वे भरती प्रकरणात अशी वक्तव्ये केली होती ज्यामुळे तणाव निर्माण झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कल्याण कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता.आता हा खटला ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला आहे.या खटल्याची न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात सुनावणी झाली.
राज ठाकरे यांच्यासह या खटल्यातील इतर आरोपी असलेले सात जण कोर्टात उपस्थित होते. मनसेच्या वरिष्ठ फळीतील नेते नितीन सरदेसाई,अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव हे देखील कोर्टात हजर होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावणी दरम्यान न्यायालयाने थेट विचारणा केली,“तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?” प्रश्नावर राज ठाकरे यांनी कोणताही संभ्रम न ठेवता,“मला गुन्हा कबूल नाही,” असे स्पष्ट उत्तर दिले.राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यानंतर,हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने न्यायाधीशांनी सूचक टिप्पणी केली.न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाचे विधान केले.तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यापुढे यायची गरजही लागणार नाही.”तसेच, सहकार्य मिळाल्यास हे प्रकरण जून महिन्यापर्यंत निश्चितपणे संपवता येईल,असे कोर्टाने नमूद केले.यावेळी राज ठाकरे यांच्या कायदेशीर बाजूचे प्रतिनिधित्व ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी केले.