Wednesday, December 10, 2025

ज्ञानदेवे रचिला पाया...

ज्ञानदेवे रचिला पाया...

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर

ऋद्धिपूर या स्थळाचे मराठीच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मराठी विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी केली आहे. मराठीच्या विकासासाठी नवे विद्यापीठ उभे राहणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र या पार्श्वभूमीवर ‘शिक्षणातील मराठी’ या विषयाचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. मी यापूर्वी या सदरातून आणि अन्यत्र देखील शिक्षणातील मराठीचे जतन संवर्धन या विषयाला वारंवार स्पर्श केलेला आहे . याबाबत काही मुद्यांचा पुनरुच्चार पुन्हा पुन्हा होणे गरजेचे आहे. शिक्षणातील मराठी माध्यम या विषयाला विविध राजकीय कंगोरे प्राप्त झाले आहेत. शालेय स्तरावर एकीकडे एका भाषेसमोर दुसरी भाषा उभी करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांचे स्तोम माजवणे, मराठी शाळांसाठी राखीव असलेले भूखंड लाटण्याची कारस्थाने करणे हे प्रकार सुरू आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २००२ सालापासून मराठीसमोर उभ्या ठाकलेल्या बागुलबुवाचे भय अजूनही संपलेले नाही.

पदवी पातळीवर मराठी भाषा व साहित्याचा अभ्यास जिथे वर्षानुवर्ष सुरू होता तिथे आज विभाग ओस पडतील की काय अशी असुरक्षितता निर्माण झाली आहे. पदव्युत्तर स्तरावर मोजकी विद्यापीठे सोडली तर मराठीची स्थिती काय आहे, याचा लेखाजोखा घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कोणतीही भाषा जगवण्यासाठी ती उच्च शिक्षणात जगली पाहिजे आणि त्यासाठी अस्तित्वात असलेल्या विद्यापीठांनी कृतिशील पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांनी मराठी भाषेसंबंधातील नवनवीन अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या विद्याशाखांमधील मुलांनी भारतीय भाषांचा अभ्यास करण्याचा मार्ग नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आज खुला केला आहे.

विद्यापीठांनी यासाठी भाषांच्या अभ्यास व संशोधनाला चालना आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मला अभिमानाने हे नमूद करावेसे वाटते की आमच्या सोमैया विद्याविहार विद्यापीठाने पदव्युत्तर तसेच पीएचडी पदवीसाठी मराठीचे अभ्यासक्रम तर सुरू केले आहेतच; परंतु तसेच भाषा आणि साहित्याच्या अंगानेही नावीन्यपूर्ण अशा विविध अभ्यासक्रमांचीही रचना केली आहे . महाराष्ट्रात मराठीच्या जतन संवर्धनासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासनाचे भाषा विभाग, सांस्कृतिक विभाग यांनी याकरता उचित पावले उचलणे ही त्यांची जबाबदारी आहे .

केवळ उत्सवी कार्यक्रमांमध्ये न रमता एकीकडे मराठीचे संचित जपून ठेवण्यासाठी आणि दुसरीकडे ज्ञानभाषा म्हणून मराठीचा विकास करण्यासाठी तत्पर राहण्यासाठी शासनाने आणि कंबर कसली तरच अभिजात मराठी कळसाला पोहोचलेली दिसेल. अन्यथा ‘ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया ‘हे म्हणण्याचा आम्हाला काय अधिकार ?

Comments
Add Comment