कोकण आयकॉन : सतीश पाटणकर
ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथे झाला. वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचे वडील कृष्णाजी व आई मुक्ताबाई. मुक्ताबाई आबा भास्कर परुळेकर या प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कन्या. त्यामुळे लहानपणापासून वसंत यांच्या कानावर भजन, कीर्तन, दशावतारी संगीत आले व त्याची गोडीही लागली. त्यांचे शालेय शिक्षण गावीच झाले. सर्कशीत जावे असे त्यांना लहानपणी वाटत होते, म्हणून ते कोकणातून कोल्हापूर येथे त्यांचे काका नरहरी यांच्याकडे आले; परंतु सर्कशीत न जाता प्रभात फिल्म कंपनीत गेले. मूकपटांतून किरकोळ भूमिकाही त्यांनी केल्या. १९३० मध्ये प्रभातच्या खुनी खंजर या मूकपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्याच सुमारास प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्या बोलपटात त्यांनी संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचे साहाय्यक म्हणून काम केले, तर १९३४ साली प्रभात फिल्म कंपनीचे कोल्हापुराहून पुण्यास स्थलांतर झाल्यावर वसंतरावांनी केशवराव भोळे आणि मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्यासारख्या संगीत - अभ्यासकांबरोबर साहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या सहवासात राहून त्यांनी गाण्यातील स्वर, तान, मुरकी इ. संगीत-विशेष संपादन केले व रसानुकूल भावदर्शन आपल्या गाण्यात आणण्याचे कसब दाखविले तसेच स्वतंत्र स्वररचनेचे तंत्रही त्यांनी हाताळले. कोल्हापुरातील वास्तव्यात ते गायन समाज देवल क्लब या संगीत संस्थेत जात असत. तेथे त्यांना शास्त्रीय संगीतातील दिग्गज उस्ताद अलाउद्दीन खाँ, उस्ताद अब्दुलकरीम खाँ, उस्ताद मंजी खाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांचा सहवास लाभला. याचाही परिणाम त्यांची शास्त्रीय संगीतातील रूची वाढण्यात झाला.
काही तरी वेगळे करण्याची ऊर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असताना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमध्ये असताना अल्लादियां खाँ व मंजी खाँ यांसारख्यांचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजातील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली. प्रभातमध्ये संगीत, पार्श्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर… मा. वसंत देसाई यांच्या कारकिर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांचा पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी). राजकमलच्या या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशीमधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या ‘अमरभूपाळी’ या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे. अभिजाततेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजेचे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावुक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामच्या आईमध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो.
वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवानमधील ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ हे गाणे किंवा मोलकरीणमधील ‘देव जरी मज, दैव जाणिले कुणी’ ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वाऱ्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना - सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी - मराठीतून दिली. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. मा. वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे...’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची दाद आहे. ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ‘ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ‘जिंकू किंवा मरू’ या ग. दि. माडगूळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा. वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. वसंत देसाई यांच्या स्वरसाजाने समृद्ध झालेल्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाने मराठी रंगभूमीची संगीत परंपरा पुन्हा सुरू झाली. या नाटकातील ‘जय गंगे भागिरथी’ आणि ‘नयन तुझे जादुगार’ ही गाणी खूप गाजली. याशिवायही जय जय गौरीशंकर, देव दीनाघरी धावला, देह देवाचे मंदिर, शाबास बिरबल इत्यादी नाटकांना त्यांनी संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मा. वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.